Spread the love
  • सीमाप्रश्न सोडवण्यासाठी ‘लाखो सह्यांच्या मोहिमेला’ येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा पाठिंबा
    येळ्ळूर:
    बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सीमाप्रश्न निकाली काढण्यासाठी आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘लाखो सह्यांच्या मोहिमेला’ आता लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे. या विधायक आवाहनाला येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला पाठिंबा जाहीर केला असून, विभागातील प्रत्येक घराघरातून ही मोहीम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री विलास घाडी होते.

बैठकीच्या प्रारंभी गावातील निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून श्री प्रकाश मरगाळे साहेब यांची निवड झाल्याबद्दल येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाला नव्याने गती देण्यासाठी आणि मराठी भाषिकांची एकजूट दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने स्वाक्षरी मोहीम राबवण्याचे पाऊल उचलले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना केंद्र सरकारपर्यंत अधिकृतपणे पोहोचवल्या जाणार आहेत.

सीमा लढ्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येळ्ळूर गावाने नेहमीच अशा आंदोलनांमध्ये पुढाकार घेतला आहे. येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले. “हा केवळ पत्रकारांचा लढा नसून तो प्रत्येक सीमावासियाच्या अस्तित्वाचा लढा आहे. येळ्ळूर विभागातील प्रत्येक मराठी भाषिक या मोहिमेत सहभागी होऊन आपले योगदान देईल,” असे प्रतिपादन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

येळ्ळूर विभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने येळ्ळूर व परिसरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या सह्या घेतल्या जाणार आहेत.
तरुण पिढीला या लढ्याची तीव्रता कळावी यासाठी विद्यार्थ्यांचाही सहभाग नोंदवला जाईल व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा सुद्धा वापर केला जाणार आहे. यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, जेव्हा ही स्वाक्षरी मोहीम आपल्या भागात येईल, तेव्हा कोणत्याही मतभेदांना थारा न देता केवळ ‘मराठी’ म्हणून एकत्र येऊन या मोहिमेला ऐतिहासिक यश मिळवून द्यावे.
पत्रकार संघाच्या या धाडसी पावलामुळे सीमाप्रश्नाला पुन्हा एकदा नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, येळ्ळूरच्या पाठिंब्यामुळे या मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे.

बैठकीला येळ्ळूर विभाग समितीचे अध्यक्ष विलास घाडी, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, परशराम परीट, मनोहर अ. पाटील, परशराम घाडी,शंकर टक्केकर, मल्लप्पा काकतिकर, तानाजी पाटील, महेश कुगजी, शुभम जाधव, आकाश नायकोजी, अमित मुचंडी, मदन धामणेकर, नागराज चांगळी, प्रसाद पाटील, भाऊराव मुंचंडीकर, योगेश कदम, अक्षय पाटील, राहुल कुगजी आदी उपस्थित होते