Spread the love

मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संघटनात्मक शक्ती असून, समाजाला राजकीयदृष्ट्या पोखरण्याचा प्रयत्न कोणीही केला तर त्याला चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा मराठा समाजाचे गुरु श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी दिला. सकल मराठा समाज बेळगावचे नेते किरण जाधव यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा समाज नेहमी हिंदुत्व आणि सामाजिक कार्यात आघाडीवर राहिला असून, मात्र राजकीय लाभांच्या बाबतीत तो मागे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आगामी काळात विविध राजकीय पक्षांत विखुरले गेलेले मराठा समाजातील नेते, कार्यकर्ते आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींना एकत्र करून संघटित ताकद उभी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजाच्या सुख-दुःखात सहभागी राहणारे नेतृत्वच समाजाचा खरा विश्वास संपादन करू शकते, असे सांगत स्वामीजींनी संघटन, संवाद आणि एकजूट हाच पुढचा मार्ग असल्याचे ठामपणे नमूद केले.