Spread the love

बेळगाव तालुक्यातील होसवंटमुरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भूतरामनहट्टी गावातील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अँटी करप्शन अँड ह्युमन राइट्स फ्रंट (कर्नाटक) यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात गावातील गटारे व पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, शाळा परिसरातील पाण्याची टाकी खराब अवस्थेत असून तिची त्वरित दुरुस्ती आवश्यक आहे. तसेच गावात कचरा विल्हेवाटीसाठी दररोज कचरा वाहन येत नसल्याने अस्वच्छता वाढत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
याशिवाय, जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित वॉटरमन नियमितपणे काम करत नसल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने या सर्व मुद्द्यांवर तातडीने योग्य ती कारवाई करून गावातील स्वच्छता व पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.