Spread the love

मुतगा येथील व्यंकटेश नगर भागात पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनमध्ये गटारीचे घाण पाणी मिसळत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवासी आप्पांना वस्तवाड आणि त्यांचे सुपुत्र बल्लू वस्तवाड यांनी थेट ग्रामपंचायतीकडे धाव घेतली.
घरातील नळातून येणारे घाण पाणी बादलीत भरून त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात नेले. संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती दाखवण्यासाठी ते हे पाणी कार्यालयातच ओतण्याच्या तयारीत होते. मात्र त्यावेळी ग्रामविकास अधिकारी गैरहजर असल्याने संभाव्य गोंधळ टळला.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दोघांची समजूत काढत दोन दिवसांत पाइपलाईनची दुरुस्ती करून समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वस्तवाड पिता-पुत्र माघारी परतले.
यावेळी बल्लू वस्तवाड म्हणाले की, “यापूर्वीही ग्रामपंचायत सदस्यांना वारंवार तक्रार देण्यात आली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. आज अधिकारी उपस्थित असते तर त्यांच्या अंगावरच हे पाणी ओतले असते.”
दरम्यान, या प्रकारामुळे व्यंकटेश नगर परिसरात संतापाची लाट पसरली असून ग्रामपंचायत सदस्य व संबंधित अधिकारी आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष देतील का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.