Spread the love
  1. गरजू विद्यार्थ्यांना शांताई विद्या आधारचा हातभार; शिक्षणासाठी 20 हजारांची मदत
    बेळगाव : आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने शांताई विद्या आधार संस्थेने दोन गरजू विद्यार्थ्यांना 20 हजार रुपयांची शैक्षणिक मदत देत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे.
    एम.व्ही. हेरवाडकर इंग्लिश मीडियम शाळेतील ओजस कांग्राळकर आणि सावी कांग्राळकर या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या फीची रक्कम संस्थेमार्फत देण्यात आली. रॉय रोड, फर्स्ट गेट येथील शांताई विद्या आधार कार्यालयात विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना धनादेश सुपूर्द करण्यात आला.
    यावेळी विश्वास पाटील आणि विनायक बोंगाळे यांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले. कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
    याचबरोबर संस्थेने शाळा व नागरिकांना जुनी वर्तमानपत्रे आणि पुस्तके देण्याचे आवाहन केले आहे. या साहित्याची विक्री करून मिळणारा निधी अधिक गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जाणार आहे.
    गेल्या 13 वर्षांपासून कार्यरत असलेल्या शांताई विद्या फाउंडेशनने दरवर्षी सुमारे 500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देत समाजात शैक्षणिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
    ही उपक्रमशीलता गरजू विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या संस्थेच्या ध्येयाची प्रचिती देणारी आहे.