Spread the love

बेळगाव : कर्नाटक राज्याचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची टीका भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, या अर्थसंकल्पात महिलांचे सक्षमीकरण, युवकांना रोजगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देणाऱ्या ठोस व दीर्घकालीन योजनांचा अभाव दिसून येतो. केवळ घोषणा आणि गॅरंटी योजनांवर भर देत राज्यावर कर्जाचा वाढता बोजा टाकण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्योग, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीसाठी आवश्यक दूरदृष्टी या अर्थसंकल्पात दिसून येत नसल्याची टीकाही त्यांनी केली. महिलांच्या सक्षमीकरणाच्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी महिलांच्या उद्योग, स्वयंरोजगार आणि आर्थिक स्वावलंबनासाठी प्रभावी उपाययोजना या अर्थसंकल्पात पुरेशा प्रमाणात नसल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि महिलांना व युवकांना सक्षम करणारा अर्थसंकल्प अपेक्षित होता. मात्र हा अर्थसंकल्प त्या अपेक्षांवर खरा उतरलेला नसल्याचे डॉ. सोनाली सरनोबत यांनी स्पष्ट केले.