Spread the love

उडुपी : दावणगेरे दक्षिण व बागलकोट या दोन्ही मतदारसंघांतील आगामी पोटनिवडणुकांत काँग्रेस पक्षाचे उमेदवार निश्चितपणे विजयी होतील, असा ठाम विश्वास महिला व बालविकास मंत्री तसेच उडुपी जिल्ह्याच्या प्रभारी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला. कुंदापूरजवळील कोटेश्वर येथील युथ मेरिडियन हेलिपॅडवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सामान्यतः पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाकडे मतदारांचा कल असतो. राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांचा लाभ घराघरात पोहोचला असून त्यामुळे नागरिकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. विशेषतः महिला मतदारांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
टिकिटाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, लोकशाहीत प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे. मात्र विजय हाच पक्षाचा प्रमुख निकष असून शमनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मतदारसंघात त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात आली आहे. हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असून त्यास आम्ही बांधील आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वराही प्रकल्पाबाबत दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांनी निवेदने दिली असून कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये, ही सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनीही संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असून शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल अशा पद्धतीने कामे लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय बायंदूर येथील नव्या केएसआरटीसी बसस्थानकात काही बस येत नसल्याच्या प्रश्नावर त्यांनी लवकरच जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्यात येईल, अशी ग्वाही दिली.