Spread the love
  1. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना ज्या दूरदृष्टीचा, संघटनशक्तीचा आणि संस्कारांचा पाया घातला, त्याच प्रेरणेने आता युवक पिढी घडवण्यासाठी *‘दूरदृष्टी प्रकल्प गुरुकुल’*ची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती जगद्गुरु वेदांताचार्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    स्वामीजी म्हणाले की, हा प्रकल्प केवळ शिक्षणापुरता मर्यादित नसून तो शिक्षण, अध्ययन, सामाजिक सेवा, देशसेवा आणि आध्यात्मिक चिंतन यांचा समन्वय असलेले संस्कार केंद्र ठरणार आहे. बाल्यावस्थेपासून युवकांपर्यंत एकत्रित पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण व मूल्यसंस्कार देण्याचा या गुरुकुलचा उद्देश आहे.
    ते पुढे म्हणाले की, “संघटना हीच खरी अद्भुत शक्ती आहे. संघटित समाजातूनच सशक्त राष्ट्र आणि सनातनी आध्यात्मिक मूल्यांची जपणूक शक्य आहे.” या गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी, चारित्र्यनिर्मिती आणि आध्यात्मिक जागृती निर्माण केली जाणार आहे.
    हा प्रकल्प फक्त कर्नाटकापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशातील युवक, समाज आणि ज्येष्ठ मंडळी यांना एकत्र आणून समाजघडणीचे कार्य करणार असल्याचेही स्वामीजींनी स्पष्ट केले.
    येत्या दहा ते पंधरा दिवसांपासून या महत्त्वाकांक्षी कार्याला प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात येणार असून, दीड ते दोन वर्षांच्या कालावधीत या गुरुकुल प्रकल्पाचे भव्य आणि शानदार उद्घाटन करून तो सर्व समाजासाठी समर्पित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
    विशेषतः बेळगाव ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांवर अतूट प्रेम करणाऱ्या, स्वाभिमानी आणि राष्ट्रभक्त युवकांची आहे. “रक्तामध्ये शिवरायांचे गुण असलेल्या युवकांची ही पावन धरती असल्यानेच येथेच ‘दूरदृष्टी प्रकल्प गुरुकुल’ची स्थापना करण्यात येणार आहे,” असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले.
    या गुरुकुलच्या माध्यमातून भविष्यात संस्कारक्षम, राष्ट्रनिष्ठ आणि समाजासाठी समर्पित नेतृत्व घडवण्याचा संकल्प करण्यात आला असून, हा प्रकल्प समाजासाठी एक नवा आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.