Spread the love

बेळगाव जिल्ह्यातील काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भूतरामट्टी गावात अवघ्या १४ दिवसांच्या नवजात बालिकेची विष पाजून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूतरामट्टी येथील भिमराय चिप्पाडी यांचा विवाह उकड गावातील शिला हिच्याशी झाला होता. विवाहानंतर वर्षभराने त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. मात्र, जन्मानंतर अवघ्या १४ दिवसांतच या निष्पाप बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी भिमराय याने मुलगी झाल्याच्या कारणावरून हा कट रचल्याचा संशय आहे. त्याने होनगा येथील मेडिकलमधून कीटकनाशक औषध खरेदी केले तसेच बेळगाव शहरातून निप्पल आणले. त्यानंतर उकड येथे जाऊन बालिकेला दूध देण्याच्या बहाण्याने त्या निप्पलच्या साहाय्याने विष पाजल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने आरोपीने औषधाची बाटली व निप्पल गावाबाहेर फेकून दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान, बालिका अचानक रडू लागल्याने व औषधाचा वास येऊ लागल्याने आईला संशय आला. काही वेळातच बालिकेचा मृत्यू झाला.
यानंतर आईने कागती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून सीपीआय शिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी भिमराय चिप्पाडी याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याचा गुन्हा उघड झाला असून घटनास्थळाजवळून औषधाची बाटली व निप्पल जप्त करण्यात आले.
या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण गावात संताप व्यक्त होत असून नागरिकांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे